Pen


PEN 29-4 : इतर १ : दीर्घकथा १ : दोष कुणाचा ? : प्रकरण पाच : लेखक-आलोक जत्राटकर

महेशच्या मनातील खळबळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.  पण तो मला इतकंच म्हणाला, 'उद्या आपली गाडी घेऊन जाऊन तिचं सर्व सामान घेऊन ये.  माडीवरची खोली तिला देवूया.'

प्रीतीला येऊन आता बरेच दिवस झाले होते.  महेश शक्यतो तिला टाळायलाच बघायचा.  प्रीतीही जास्ती ताणत नसे.  ती तर स्वत:ला अगदी झोकून देऊन पप्पांची सेवा करत असे.  अलिकडे त्यांची तब्येत वारंवार बिघडू लागली होती.  पण प्रीती त्यांची अगदी मनापासून देखभाल करीत असे.  महेशसुध्दा कितीदातरी ती अशी कामात असली की पहात रहायचा.

एक दिवस तो प्रीतीला म्हणाला,

'प्रीती, तु माझ्या वडीलांची अतिशय काळजी घेत्येयेस.  मीसुध्दा त्यांची एवढी काळजी घेतली नसती.  थैंक यू.  आय वील बी ऑलवेज ग्रेटफूल टू यू !' 

यावर प्रीती त्याला म्हणाली,

'महेश, मला कोणी नसताना पप्पांनीच माझी समजूत घातली.  मला आधार देऊन सावरलं.  त्यांची देखभाल करणं हे माझं आद्यकर्तव्य आहे. त्या माझ्याकडून काही कुचराई होणार नाही.  पण शेवटी परमेश्वराला जे मंजूर असेल तेच होईल.'

नंतर पप्पांची तब्येत फारच खालावत गेली.  त्यांना किडनीचा त्रास सुरु झाला.  दोन्ही किडनीज् निकामी झाल्या.  त्यामुळे त्यांना नियमित कालखंडाने डायलेसिससाठी न्यावे लागे.  पण प्रीती मात्र हे सर्व करत होती.  पण कृत्रिमरित्या तरी किती काळ मनुष्य तग धरणारअखेरीस पप्पा गेले.  अनंत आठवणी मागे ठेवून, पोरकेपणाची भावना मनाला देऊन !

पप्पांचे उत्तरकार्य पार पडले.  ताई, भावोजी आणि भाचा आले होते, ते सर्व परत गेले.  प्रीतीची अवस्था मात्र मला पाहवत नव्हती.  आठ दिवसांत किती निस्तेज झाली होती ती सर्व भावना मेल्याप्रमाणे एका ठिकाणीच ती बसून होती.  महेशही या दिवसात खोलीबाहेर काही पडला नव्हता.  सर्व कारभार मीच मग देखरेखीखाली ठेवला होता.  शेवटी बाकीची कामे बंद पडून चालणार नव्हते.  मी महेशला त्या दिवशी बळेच बाहेर काढले आणि गाडीत घालून त्याला ऑफिसच्या आवारात सोडले.  ऑफिसात त्याच्यासमोर कामाचा ढीग ठेवला.  मी बाहेर पडत असताना महेश एकच वाक्य पुटपुटला, 'पप्पा, अखेर तुम्हीही मला एकटंच सोडून गेलात ना?'  मी झटकन् बाहेर आलो.

 

****

             महेश आता व्यवस्थित सावरला होता.  पण प्रीती मात्र अजून उद्वीग्नावस्थेतच होती.  तिची समजूत कशी घालावी हेच मला कळेना.

            एक दिवस सकाळी सकाळी प्रीती तिचे सर्व साहित्य बॅगमध्ये भरत होती.  बहुतेक इथून जाण्याची तिची तयारी सुरु असावी, असं वाटून मी महेशला तसं सांगितलं.  हे ऐकून महेश तिच्या खोलीत गेला.  त्यानं तिला विचारलं,

'काय करत्येयेस प्रीती?'

'साहित्य बॅगमध्ये भरत्येय.'

'कुठे जाणार इथून?'  महेशचा प्रश्न.

'कुठं तरी जावंच लागेल.  केव्हातरी जायचंच होतं.  ज्यासाठी आले होते,  तेच काम नाही उरलं.  मग इथं थांबून काय करु?'

'प्रीती, तू जाणार असशील तर मी तुला अडवणार नाही.  पण तू कायम इथंच रहावंस अशीच पप्पांची इच्छा होती.  आणि...आणि आपल्यालाही एकमेकांच्या आधाराची गरज आहे.'

इतकं बोलून महेश झटकन निघून गेला. 

'वैनी', मी प्रीतीला महेश नसताना हीच हाक मारत असे, 'आता तुम्ही इथून जाऊच शकत नाही.  महेशला तुमची नितांत गरज आहे.आणि प्रीतीनेही आपली बॅग खोलीत नेवून ठेवली.

 

***

 पुण्यामध्ये कोथरुडच्या रम्य परिसरात एका बंगल्याचे कन्स्ट्रक्शनचे काम महेशने हाती घेतले होते.  पण तो मला त्या साइटवर कधीही पाठवत नसे.  अधूनमधून रसभरित वर्णने मात्र करीत असे.  तो बंगला कुणासाठी आहे.  हेही तो बोललेला नव्हता.  एकूणच या बंगल्यामुळे माझ्या मनात मात्र गैरसमज निर्माण झाला.  महेशचा माझ्याबद्दलचा विश्वास कमी झाला होता की काय माझ्या हातून अशी कोणती चूक घडली की आमच्यात असा दुरावा निर्माण झाला.  दुरावा म्हणता येणार नाही किंवा अविश्वासही म्हणता येणार नाही कारण एवढे एक बांधकाम सोडले तर इतर ठिकाणचे जवळजवळ सर्व बांधकाम मी माझ्या देखरेखीखाली करत होतो.  मग या बंगल्यातच असे एवढे काय होते की मी तिथे जायला अपात्र होतो ?

            सहा महिन्यानंतर त्या बंगल्याचे बांधकाम तसेच फिनिशींग झाल्याचे महेशने मला सांगितले.  पण मी मुद्दामच त्यात स्वारस्य दाखविले नाही.

            दुसऱ्या दिवशी महेशने मला त्याच्याबरोबर गाडीत घेतलं आणि गाडी कोथरुडकडे वळवली.  मी ओळखलं की, हा मला बहुतेक मला 'त्याच' बंगल्याकडे नेतोय.  पण मी काहीच बोलता शांत बसलो.

            गाडी एका बंगल्यासमोर थांबली.  मी गाडीतून उतरलो आणि त्याकडे पहातच राहिलो.  'अप्रतिम' हा शब्दही तोकडा पडेल असेच बांधकाम झाले होते.  महेशचे एकूण यश हे त्याच्या अशा कामातच तर सामावलेले होते.  'जर हा बंगला मी घेतला असता तर' असा एक प्रश्न अवेळी माझ्या मनात डोकावला.

मी महेशला विचारले,

 'हा बंगला खरोखरच सुंदर झालाय.  पण मी जेव्हा तुला विचारायचो, तेव्हा तू मला टाळायचास.  आता तरी सांग की हा बंगला तू कोणासाठी बांधतोयस?'   

महेश मिस्कीलपणे हसत बोलला,

'साहेब, हा बंगला मी तुमच्यासाठीच बांधलाय..!'

'महेश का माझी थट्टा करतोयेस ? सरळ सांगणार असलास तर सांग नाहीतर राहू दे.'

'लक्ष्या, मी शक्यतो कोणाचीही थट्टा करीत नाही.  मी हा बंगला तुझ्या लग्नात तुला प्रेझेंट देणार आहे.'

'माझं लग्न?' मला आश्चर्याचा धक्का बसला.

या माझ्या प्रश्नावर महेशनं जे सांगितले त्यातलं मला काहीही माहित नव्हतं.  या पठ्ठ्याने नाशिकला माझ्या आई-वडिलांशी संधान साधले होते.  बाबांनी तिथलीच एक मुलगी - संगीता पसंत करुन घेतली होती, जी कधीकाळी माझी बालमैत्रीण होती. आता जवळजवळ ती विस्मरणातच गेली होती.  त्या स्मृती परत जाग्या झाल्या.  लहानपणीचा सर्व सुखाचा कालखंड डोळयासमोरुन गेला.  माझ्या वडिलांनी मात्र आयुष्यात पहिल्यांदाच मला अनुकुल असा निर्णय घेतल्याने मला त्यांचा अभिमान वाटला.  आईलाही मी केवळ मनातूनच भेटत होतो.  प्रत्यक्ष भेट नव्हतीच.

            माझ्या लग्नाचा एवढा निर्णय महश्याने घेतला होता पण मला कळूसुध्दा दिले नव्हते.  केवळ मैत्रीच्या एका धाग्यात बांधल्या गेलेल्या अशा माझ्यासाठी त्याने इतके काही केले होते.  हा एकच धागा जगातल्या इतर सर्व धाग्यांपेक्षा कितीतरी अतूट असा होता.  मी नकार दिला असता तर महेश फारच नाराज झाला असता.  म्हणून त्याने दिलेले प्रेझेंट मला नाकारावेसेही वाटेना !

           त्याने घरी गेल्यावर सर्व हकीकत प्रीतीला सांगितली.  तिलाही हे ऐकून आनंद झाला.  अलिकडे महेश प्रीतीशी व्यवस्थित बोलू लागला होता.  आपल्या पप्पांसाठी तिने घेतलेले कष्ट त्याला आठवत असल्याने तो तिचा कृतज्ञ होता.  तसेच, आपल्याशिवाय तिला कोणाचाही आधार नाही, याचीही जाणीव त्याने ठेवली होती.  पण म्हणून त्याने तिला कोणत्याही गोष्टीपासून वंचित ठेवलेले नव्हते.  तिच्या मनाप्रमाणे तो तिला वागू देत होता.  तिला नर्सिंग करण्यापासूनही त्याने रोखलेले नव्हते.

      प्रीतीलाही याची जाणीव होतीच.  म्हणून तीसुध्दा महेश दुखावेल असे कधीही वागत नसे.  याप्रमाणे दोघेही आपापल्यापरीने एकमेकांना सांभाळत होते.  आणि मलाही तेच हवे होते.

       संगीताशी माझं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं.  लग्न नाशिकला झालं.  तिकडे ताईही आल्या होत्या.  त्या लग्न झाल्यावर लगेच परतल्या.  त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता मात्र मला सतत अस्वस्थ करीत होती.  एक ना एक दिवस ही अस्वस्थता संपून आनंद प्राप्त होणार आहे.  अशी आशाही मला होती. 

मी पुण्याला परतताना महेश वडीलांना म्हणाला,

'आता तुमचं वय झालंय.  तुम्ही आराम करायला पाहिजे.  इथलं सगळं विकून माझ्याबरोबर चला.  आणि उरलेलं आयुष्य समाधानात घालवा.  तुमच्या मुलाचं कर्तुत्व पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभेल.  तुमच्याकडून काहीही घेता त्यानं तुमचं नांव मोठं केलं आहे.  तेव्हा तुम्ही चला.'

मला नव्हतं वाटलं की बाबा माझ्याबरोबर येतील.  पण महेशने त्यांच्यावर काय जादू केली होती कुणास ठाऊक बाबांनी तिथल्या दुसऱ्या एका व्यापाऱ्याशी बोलणी करुन घर आणि दुकान दोन्ही विकून टाकलं आणि ते, आईला घेऊन माझ्या घरी आले.  महेशने प्रेझेंट दिलेलं ते घर पाहून संगीता आणि आईबाबांना त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला.  कितीतरी वर्षानंतर मी माझ्या आईबाबांबरोबर रहात होतो.  त्यांचा सहवास अनुभवत होतो, ही सर्व केवळ महेशचीच कृपा होती.  माझ्या वडिलांचा स्वभाव बदलण्यालाही तोच कारणीभूत होता.  माझा नवा संसार मात्र व्यवस्थित सुरु झाला. माझ्या बायकोची आणि प्रीतीची आता चांगलीच ओळख झालेली होती.  त्या दोघी चांगल्या मैत्रिणीच बनल्या होत्या म्हणा ना !

            अशातच दुधात साखर पडली तशी गोड बातमी कोल्हापूरहून ताईंनी कळविली ती म्हणजे भावोजींची बदली पुण्याला झालेली होती.  त्यांना महेशने त्याच्याच घरी ठेवून घेतले.  आपली ताई आपल्याजवळ आल्याने तो निर्धास्त बनला होता.  प्रीतीनेही भावोजी आणि भाचरांचे मन जिंकून घेतले होते.  त्यांनाही आपली मामी पसंत होती.  लग्नाबद्दल मात्र कोणीच काही बोलत नव्हते.

            ताईंच्या सांगण्यावरुन 'आंतरराष्ट्रीय बालक दिना' निमित्त महेश 'आसरा' या लहान मुलांच्या अनाथाश्रमास कंपनीतर्फे मिठाई वाटण्यासाठी गेला होता.  तिथं तिथल्या प्रमुखांकडून त्याला त्या छोटया निरागस मुलांच्या वाईट परिस्थितीची कल्पना आली.  विना आई-बापांची पोरं कशी जगत असतील हीदोन महिन्यापासूनची ते बारा वर्षांपर्यंतची मुलं तिथं होती.  त्यांच्या विषयी महेशला अपार करुणा वाटू लागली.  यातल्या एका तरी मुलाला दत्तक घेऊन एक सामाजिक बांधीलकी राखावी, असा विचार करुन महेश घरी आला.  त्यानं ताईशी याबाबतीत चर्चा केली.  ताईंनीही आनंदानं त्याला पाठिंबा दिला.  मग ही गोष्ट त्यानं प्रीतीला सांगितली.  तिनंही त्याला होकार दिला.  पण महेशने त्यासाठी तिला नोकरी सोडून आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी राजी केले होते. 

            एक दिवस ते दोघं त्या अनाथालयात गेले.  तिथं ते एकच मूल घेणार होते.  पण मुलगा घ्यायचा की मुलगी या विषयावर त्यांचे काही एकमत होईना.  मग शेवई महेशने पाच वर्षांच्या अमितला तर प्रीतीने दोन वर्षांच्या साक्षीला पसंत केले.

            मी, संगीता, ताई, भावोजी आणि कुणाल (ताईंचा मुलगा) असे दारात त्यांच्या स्वागतासाठी उभे होतो.  बाहेर गाडीतून ही जोडगोळी जेव्हा एका ऐवजी दोन मुलांना घेऊन उतरली तेव्हाचे दृश्य मजेदार होते.  अमित जरी शांतपणे महेशच्या काखेत बसला होता.  तरी छोटया साक्षीला शांत करताना मात्र प्रीतीची धांदल होत होती.  त्यांना पाहून मी हळूच संगीताला म्हणालो,

'बघ. लग्न करताच हे दोघं एकदम दोन मुलांचे आईबाप झालेत.  आता आमच्या नशीबात हे सुख केव्हा येणार देव जाणे!हे माझं वाक्य ऐकून संगीता अशी काही लाजली की सात जन्म त्या लाजण्यावर ओवाळून टाकण्याची माझी तयारी होती. 

            मुलांच्यात महेश आणि प्रीती दोघंही रमली होती.  साक्षी बोलण्याचा प्रयत्न करु लागली होती.  शिवाय ती बोट धरुन चालूही शकत होती.  अमित तर त्या दोघांना पप्पा, मम्मी म्हणूनच हाक मारीत असे.  त्यालाही महेशने बालवाडीत दाखल केले होते.

            यानंतरच महेशने आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला.  त्यानं मला आणि ताईंना बोलावून सांगितलं,

'ताई, पुढच्या आठवडयापासून मी ठाण्याच्या फाइव्ह स्टार हॉटेलचं काम सुरु करतोय.  कालच, तशी ऑर्डर मला मिळाली आहे.  हे काम माझ्या कारकीर्दीतलं सर्वात महत्त्वाचं आहे कारण प्रथमच मी पुण्याबाहेरचं एवढं मोठं काम हाती घेतोय.  एक दोन महिन्यात काम व्यवस्थित मार्गी लागलं की, मी आणि प्रीती विवाहबध्द होऊ.  नाहीतरी मुलांना आमचा लळा लागलाच आहे.  त्यामुळं लग्न ही फक्त एक फॉर्मेलिटी आहे.त्याच्या या निर्णयानं मी आणि ताई खरोखरच आनंदित झालो. 

 'देर से समझे लेकिन दुरुस्त समझे!' असा विचार करत ती आनंदाची बातमी संगिताला सांगण्यासाठी मी घराकडे जायला निघालो.

महेश ठाण्याच्या हॉटेलच्या बांधकामावर स्वत: हजर राहून काम व्यवस्थित चालवत होता.  त्याला पुण्याबाहेर करीअर करण्यासाठी या कामात काहीही कसूर ठेवून चालणार नव्हते.  त्याच्या गैरहजेरीत पुण्यातला कार्यभार मीच सांभाळत होतो.

            एक दिवस सकाळीच महेश दारी आला. म्हणाला, 'आज हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर स्लॅब टाकणार आहे.  त्यामुळं रात्री मी येऊ शकणार नाही.  सरळ उद्या रात्रीच येईन.  तू इकडे सर्व व्यवस्थित हैंडल कर, काही गरज लागलीच तर मी तुला ऑफिसमध्ये फोन करीनच.  उद्या भेटूच ! बाय.'   असे म्हणून त्याने त्याच्या फियाटमधून ठाण्याकडे कूच केले.

दुपारी ऑफिसमधला फोन घणघणला. 

'सर, ठाण्याहून असिस्टंट कॉन्ट्रॅक्टर मुल्ला यांचा फोन आहे.  तातडीने फोन द्यायला सांगताहेत.ऑपरेटरनं सांगितलं.

'लगेच जोडून दे.मी त्याला बोललो. 

'हॅलो, मॅनेजरसाहेब, मी मुल्ला बोलतोय.मुल्लाचा आवाज काहीसा थरथरत असल्यासारखं मला वाटलं.

'हो, बोला मुल्ला, भरदुपारी का फोन करताय? काही विशेष? साहेबांचा काही निरोप तर नाही ना?'

'सर, इकडं एक दुर्घटना घडली आहे.  स्लॅबचं काम पहात असताना साहेबांचा तिसऱ्या मजल्यावरुन तोल गेला.  काही समजायच्या आतच ते खाली पडले.  रक्तस्त्राव बराच झालाय.  त्यांना आम्ही इथल्या 'पाटील हॉस्पीटल' मध्ये दाखल केलं आहे.  डॉक्टरनी ऑपरेशनसाठी नेलं आहे.  पुढं काय करायचं ते तुम्हीच सांगा.'

मला काहीच सुचेनासं झालं...डोळ्यासमोर अंधारी येवू लागली...

 (क्रमश:)

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

 

Pen Image

Pen Index